राज्यात मार्च व एप्रिल या महिन्याच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीठामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. शासनाकडून संबंधित विभागाला सूचना देऊन अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले, त्यानुसार पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहेत.
एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही
अशा नैसर्गिक संकटात शासन शेतकऱ्यांसह कायम असेल, एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करताना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
🔴 हे पण वाचा : पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्र कोणती लागणार ?
राज्यातील धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 एप्रिल 2023 रोजी अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाडी बामणी (ता.धाराशिव) या ठिकाणी भेट दिली.
यावेळी मुख्यमंत्रीसह पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, आमदार राणा जगजीतसिंग पाटील, माजी खासदार रवी गायकवाड, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.एम.प्रसन्ना, जिल्हाधिकारी डॉ. सचिन कोंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी इत्यादी विविध क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते.
10 मिमी. पाऊस नैसर्गिक आपत्ती
मुख्यमंत्री प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले, सतत पाच दिवस 10 मिमीपर्यंत पाऊस कायमस्वरूपी पाच दिवसासाठी पडत राहिला, तर पडणारा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरण्यात येईल व त्यानुसार शासनाकडून ठरविण्यात आलेल्या दराने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल.
अवकाळी पाऊस नुकसान भरपाईचा शासन निर्णय (GR) येथे पहा
त्याचप्रमाणे कांदा पिकाची सातबाऱ्यावर नोंद नसल्यास पंचनाम्यामध्ये तशा प्रकारची नोंद करून शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्यात येईल, अशी शाश्वतीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेली फळपिके, हंगामातील पिके यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मी स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यावर आलेल्या संकटाची मला जाणीव आहे, त्यासाठीच नुकसानीची माहिती घेण्यासाठी मी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलो आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.